परतवाडा (अमरावती) : मेळघाटातील चिखलदरा, धारणी, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, चांदूरबाजार तालुक्यातील रुग्णांना आरोग्यसेवा वेळेवर मिळत नसल्याने अमरावतीसारख्या शहराकडे धाव घ्यावी लागते. त्यामुळे अचलपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे.
अमरावती जिल्ह्यातील १४ तालुक्यातील सर्वाधिक रुग्णांची समस्या मेळघाटसह दर्यापूर, अजनगाव, अचलपूर, चांदुरबाजार या तालुक्यामध्ये आहे. अचलपूर उपजिल्हा रुग्णालय अस्तित्वात असूनसुद्धा सुविधा मिळत नाही. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चारही तालुक्यांना मध्यवर्ती ठरणाऱ्या परतवाडा-अचलपूर शहरात होणे अधिक उपयुक्त ठरू शकते. मेळघाटात दर वर्षी मातामृत्यू व बालमृत्यूचे मोठे असून, अपघाताचे प्रमाणही मोठे आहे. तत्काळ उपचार न मिळाल्याने अनेकांना जीव गमवावा लागतो.
अंजनगाव, अचलपूर, चिखलदरा, धारणी, चांदूरबाजार या तालुक्यासाठी परतवाडा परिसरात मोठ्या प्रमाणात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची जागा उपलब्ध असून, शासनाने पुढाकार घेतल्यास वैद्यकीय महाविद्यालयातील मोठी अडचण दूर होऊ शकते.
अमरावती शहरातील काही नेत्यांनी एकत्रित येऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अमरावतीत निर्माण व्हावे याकरीता कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय स्वागतार्ह असला तरी अमरावती शहराऐवजी हे वैद्यकीय महाविद्यालय जिल्ह्यातील होणे अत्यंत आवश्यक आहे. अमरावती शहरात डॉ. पंजाबराव देशमुख महाविद्यालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जिल्हा सामान्य रुग्णालय, तसेच अनेक खासगी रुग्णालये आहेत.
अमरावतीच्या कृती समितीच्या सदस्यांसह अचलपूर, अंजनगाव, चिखलदरा, धारणी, दर्यापूर येथील सर्वच पक्षीय राजकीय नेत्यांनी हे वैद्यकीय महाविद्यालय अमरावती शहराऐवजी ग्रामीण भागातील अचलपूर उपविभागात करण्यासाठी पुढाकार घेतल्यास खऱ्या अर्थाने या भागासाठी ही आरोग्य सेवा निश्चितच उपयुक्त ठरू शकते, असे तज्ज्ञांचे आणि नागरिकांचे म्हणणे आहे.